नाशिक : मुंबईत शिवसेना-भाजप युतीचाच महापौर होणार, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.
भाजप- शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. निवडणुकीपूर्वी युती तुटली, मात्र वाद काही दिवस असतात. घरात भांडणे होत नाहीत का ? असा सवाल उपस्थित करत, चंद्रकांत पाटलांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती करण्याचे संकेत दिले. इतर कोणत्याही पक्षांनी मनात मांडे खाऊन आनंद घेऊ नये असा टोमणाही त्यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीला लगावला. कितीही विघ्ने आली तरीदेखील राज्य सरकार 5 वर्ष पूर्ण करणार, असा विश्वासही चंद्रकांतदादांनी व्यक्त केला. राज्यातील सर्व पुलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून पुढील 3 वर्षात 14 हजार पुलांची दुरुस्ती करणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.